आलापल्लीत श्रीराम मंदिर कमिटीचा तान्हा पोळा उत्साहात
काँग्रेस नेते डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांच्या बक्षिसांनी चिमुकल्यांचा उत्साह द्विगुणित

आलापल्ली : शेती,संस्कृती,आणि आपली ओळख या त्रिसूत्रीचा जागर करत आलापल्ली येथे श्रीराम हनुमान मंदिर कमिटीने आयोजित केलेल्या भव्य तान्हा पोळा स्पर्धेने संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधून घेतले.शेतकरी राजाचा सण असलेल्या पोळ्याच्या पार्श्वभूमीवर चिमुकल्यांमध्ये आपल्या मातीची ओढ निर्माण करण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आला.
या संपूर्ण स्पर्धेचे प्रायोजकत्व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव तथा माजी जि.प. अध्यक्ष,जनतेच्या मनातील नेते डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी स्वीकारले होते.त्यांच्या सौजन्याने विजेत्यांना रोख पारितोषिके, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आले.
सकाळपासूनच श्रीराम मंदिर परिसरात ढोल-ताशा आणि सनईच्या मंगलध्वनीत बालगोपालांची लगबग सुरू होती.कोणी बळीराजाच्या वेशात,कोणी शेतकऱ्याच्या वेशात, तर कोणी आकर्षकपणे सजवलेल्या नंदी बैलासह हजेरी लावली होती.लहान मुलांनी सादर केलेल्या ‘पोळ्याचे महत्त्व’ या विषयावरील संदेशाने उपस्थितांची मने जिंकली.
परीक्षकांनी अतिशय बारकाईने परीक्षण करून विजेत्यांची निवड केली.गट A प्रथम क्रमांकाचे मानकरी,कुश चिमरालवार,शिवांश देकते आणि ईशान्वी मतणे यांनी आपल्या उत्कृष्ट वेशभूषा आणि सजावटीने प्रथम पारितोषिक पटकावले.
गट ‘B’ प्रथम क्रमांकाचे मानकरी अनुष जम्बोजवार,उमंग तलांडे,दयानंद गुलबे यांनी बाजी मारत प्रथम क्रमांक मिळवला.यावेळी मंदिर कमिटीच्या वतीने सहभागी झालेल्या प्रत्येक बालगोपालाचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीराम मंदिर कमिटी, आलापल्लीच्या पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.



