कोरेली खुर्द फाट्याजवळ भीषण अपघात; एकाचा मृत्यू, 3 जखमी – कंकडालवार यांनी रुग्णालयात जाऊन केली भेट

अहेरी : कोरेली खुर्द फाट्याजवळ 17 ऑगस्ट रोजी रात्री 7:30 वाजताच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक झाली.या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झाले आहेत.अपघातानंतर दोन्ही दुचाकींचा अक्षरशः चुराडा झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,तुमीरकसा येथील वारलू कटिया तलांडी (वय 49) आणि त्यांच्यासोबत महरू चिना तलांडी (वय 54) हे दोघेही पेरमिली येथील आठवडी बाजार आटोपून दुचाकीने घरी परतत होते.याच दरम्यान आलापल्लीच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडक देणाऱ्या दुचाकीवर सुनील देवु लेखामी (वय 28) आणि पवन शामु लेखामी (वय 24) दोघेही रा.मेडपल्ली,ता.भामरागड हे बसले होते.
अपघाताची माहिती मिळताच जखमींना तातडीने पेरमिली आरोग्य उपकेंद्रात दाखल केले.प्राथमिक उपचारानंतर रात्री सुमारे 8:30 वाजता चारही जखमींना पुढील उपचारासाठी अहेरी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
मात्र उपचारादरम्यान वारलू कटिया तलांडी यांचा मृत्यू झाला.इतर 3 जखमींवर अहेरी येथे उपचार सुरू आहेत.त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
या गंभीर घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. अजयभाऊ कंकडालवार यांनी तात्काळ अहेरी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली.त्यांनी जखमींची विचारपूस करून डॉक्टरांशी चर्चा केली आणि सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
अपघातात वारलू कटिया तलांडी यांचे निधन झाल्याने मृतदेह स्वगृही नेण्यासाठी कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता.ही माहिती कळताच अजयभाऊ कंकडालवार यांनी तातडीने चारचाकी वाहनाची व्यवस्था करून दिली.ज्यामुळे मृतदेह तुमीरकसा येथे नेण्यात आला.
यावेळी शोकाकुल कुटुंबाला धीर देताना कंकडालवार म्हणाले,अंत्यसंस्कार आणि तेरवीच्या कार्यक्रमात कोणतीही अडचण आल्यास मला तातडीने कळवा.आम्ही सर्वोतोपरी मदत करू.
यावेळी मेडपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच निलेश वेलदी,दिवाकर तलांडी,रमेश गावडे,दस्सा तलांडी,मंगेश तलांडी,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,प्रकाश दुर्गे यांच्या सह आदी उपस्थित होते.



