हवामान खात्याचा इशारा : 14 ते 20 मे दरम्यान राज्यात वादळी पाऊस व गारपीट
सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांनी 14 मे पूर्वी धान कापणी उरकावी,संचालक मल्लिकार्जुन आकुला यांचे आवाहन

सिरोंचा : महाराष्ट्रात उकाड्यानंतर आता हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.14 ते 20 मे दरम्यान राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.
या बदलत्या हवामानाचा फटका गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यालाही बसू शकतो.विदर्भात चंद्रपूर,गडचिरोलीसह सिरोंचा भागात सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.त्यामुळे शेती व ग्रामीण भागातील मालमत्तेचे नुकसान होण्याची भीती आहे.
या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते व सिरोंचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री.मल्लिकार्जुन आकुला यांनी सिरोंचा तालुक्यातील शेतकरी व नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना
1. धान कापणी तातडीने करा : ज्या शेतकऱ्यांची उन्हाळी धान कापणी बाकी आहे,त्यांनी 14 मे पूर्वी कापणी उरकून घ्यावी.कापलेले धान ताडपत्रीने झाकून सुरक्षित ठिकाणी ठेवावे.
2. मळणी करून साठवणूक करा शक्य असल्यास मळणी करून धान बाजार समितीत विक्रीसाठी आणावे किंवा गोदामात साठवावे.पावसात धान भिजल्यास मोठे आर्थिक नुकसान होते.
3. शेतातील अवजारे सुरक्षित ठेवा,ट्रॅक्टर, पंपसेट, फवारणी पंप यांसारखी अवजारे उघड्यावर ठेवू नयेत.विजेच्या उपकरणांचा प्लग काढून ठेवावा.
4. जनावरांची काळजी घ्या : जनावरांना मोकळ्यावर, झाडाखाली बांधू नये. सुरक्षित गोठ्यात बांधावे. चारा व पाण्याची व्यवस्था करून ठेवावी.
नागरिकांनी घ्यायची काळजी :
1. झाडे कोसळण्याचा धोका : वादळी वाऱ्यामुळे घरावर, रस्त्यावर झाडे कोसळू शकतात.जुनी, धोकादायक झाडे दिसल्यास तात्काळ ग्रामपंचायत किंवा वन विभागाला कळवावे.
2.वीज पडण्यापासून सावध : विजा चमकत असताना झाडाखाली, विजेच्या खांबाजवळ थांबू नये.मोबाईल व टीव्हीचा वापर टाळावा.
3.घराची तपासणी करा: घरावरील पत्रे, कौले सैल असल्यास घट्ट बांधून घ्यावीत. नाल्या व गटारे तुंबू नयेत यासाठी साफ करावीत.
4.आपत्कालीन संपर्क ठेवा: तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील व विज वितरण कंपनीचे नंबर जवळ ठेवावेत. बॅटरी, टॉर्च, मेणबत्ती तयार ठेवावी.
5. नदी-नाल्यांपासून दूर राहा: पुराचा धोका असलेल्या भागातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. लहान मुलांना पाण्याजवळ जाऊ देऊ नये.
“शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही”
यावेळी बोलताना संचालक मल्लिकार्जुन आकुला म्हणाले, “हवामान खात्याचा इशारा गांभीर्याने घ्या.14 मे नंतर पाऊस आला तर कापणीला आलेल्या धानाचे 100 टक्के नुकसान होईल.बाजार समितीच्या वतीने आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत.कुठलीही अडचण आल्यास थेट संपर्क साधा.
आकुला यांनी महसूल,कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागानेही सज्ज राहावे, अशी मागणी केली. “वीज पुरवठा खंडित झाल्यास तात्काळ दुरुस्ती करावी.रस्त्यावर झाड पडल्यास तात्काळ हटवण्याची व्यवस्था करावी,असे ते म्हणाले.
सिरोंचा तालुक्यातील प्रत्येक शेतकरी व नागरिक सुरक्षित राहावा, हाच आमचा उद्देश आहे.घाबरून न जाता सतर्क राहा,असे आवाहन मल्लिकार्जुन आकुला यांनी शेवटी केले.



